Thursday, 30 July 2015

प्रेम


म्हटलं तर छोटा अडीच अक्षरी शब्द! परंतु, किती मोठा अर्थ आणि महत्त्व लाभलय याला. तसं तर मानलं तर अख्खं जग यावरच आधारित आहे आणि नाही मानायचं ठरवलं तरीही माणूस नकळत त्यात अडकतो ... ‘प्रेम’. म्हटलं तर भावना, लागलं तर वेड, अडकलो तर व्यसन, केली तर भक्ती, झाली तर सवय, जपला तर व्यवहार, मानली तर कल्पना आणि नाही मनाला तर फक्त एक शब्द ...प्रेम

जगात सगळ्यात जास्त मतभेद असलेल्या दोन गोष्टी म्हणजे प्रेम आणि देव. पण खरंतर ही एकाच गोष्टीची दोन रूपं आहेत. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यात देव पाहतो आणि ज्याला देव मानतो त्याच्यावरच प्रेम करतो. म्हणूनच कुण्या गीतकाराला ते गाणं सुचलं ...’तुझमे रब दिखता है, यारा मै क्या करू...’

कानेटकरांच्या म्हणण्याप्रमाणे ‘प्रेम म्हणजे देण्या-घेण्याचा व्यवहार’... तर बाबा म्हणतात तसं खरं निस्वार्थी, मीरेच्या प्रेमासारखं प्रेम आज जगात अस्तित्वातच नाही... तर मंदार म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो याला काही कारणच नाही. कुणी काय म्हणतं, कुणी काय म्हणतं. परंतु, या सगळ्यात या छोट्याशा शब्दाचा अर्थ किंवा सर्वमान्य असा अर्थ मात्र कुणीच सांगू शकत नाही. खरंतर एकीकडे असही वाटतं कि प्रेम हे प्रेम असतं त्याला कशाला define करायचं? ते फक्त करायचं...जमेल तसं आणि झेपेल तसं. पण मग ज्यांना ते कळलं नाही त्यांचं काय? पण अशी माणसं जगात अभावानेच आढळतात. जशी माणसाला तहान लागते, भूक लागते... हे सगळं न शिकवता माणसाला आपोआप होत असतं. ते कधी व्हायला लागलं हे कळतही नाही. तसच प्रेमाचंही आहे. तेही माणसाला आपोआप होत असतं. फक्त प्रत्येक माणसाच्या आवडी आणि क्षमतेनुसार त्या त्या माणसाची तहान-भूक वेगळी. तसच प्रत्येक माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार त्या त्या माणसाचं प्रेम वेगळ, त्या माणसाच्या प्रेमाची पद्धत वेगळी.

खरंतर प्रेम कुणावरही बसतं. वस्तूवर, वास्तूवर, माणसावर, प्राण्यावर ... या सगळ्यात सर्वाधिक चार्चीलं जातं आणि मानलं जातं ते त्याच्या आणि तिच्यातलं प्रेम. कारण आयुष्यातल्या सुवर्णकाळात अर्थात, ऐन तारुण्यात बहरणारं हे प्रेम असतं. कारण हे एकच प्रेम असं असतं जे दोन भिन्न लिंगी व्यक्तींना कळत्या वयात शब्दशः तन-मन-धनाने जवळ आणतं, एकत्र आणतं. म्हणूनच या प्रेमाची चर्चा आणि so called gossip  जास्त होत असतं.

बऱ्याच जणांचं, विशेषतः प्रेमविवाह झालेल्यांच असं म्हणणं असतं कि आता तो/ती पूर्वीसारखं/पूर्वीइतकं प्रेम नाही करत. परंतु खरतरं प्रेम तसच असतं फक्त आपण जसे प्रियकर-प्रेयसीतून नवरा-बायकोच्या रुपात येतो तसंच प्रेमही आपलं रूप बदलून एका नव्या स्थित्यंतरात प्रवेश करतं. प्रत्येक वयातलं आणि नात्यातलं प्रेम वेगळं असतं. त्याचे आवेग वेगळे, रूपं वेगळी. त्यातले राग-लोभ-आनंद वेगळे. म्हणूनच तर म्हटलं आहे ना ‘प्रेमा तुझा रंग कसा’. या प्रेमाला ज्या रंगात आपण मिसळू, ज्या भावनेने आपण त्याकडे बघू; तो रंग किंवा ती भावना प्रेम धारण करतं. म्हणूनच त्या त्या वयातलं, क्षणातलं आणि परिस्थितीतलं प्रेम आपण तसच्या तसं स्वीकारायला हवं आणि ते पुरेपूर उपभोगायला हवं.
पहिल्या नजरेत आणि नवथर तारुण्यात हळुवारपणे उमलणारं प्रेम वेगळं आणि लग्नानंतर काही वर्षांनी नवरा-बायकोच्या नात्यातलं मुरलेलं प्रेम वेगळं. Retirement ला आलेलं असताना आपल्याच साथीदाराकडे नव्या दृष्टीने आणि जोमाने ओढलं जाणारं प्रेम वेगळं तर अगदी उतार वयात फक्त सहवासातून व्यक्त होणारं प्रेम वेगळं. 

त्या त्या वेळचं त्या त्या वयातल्या गरजा भागवणारं ते प्रेम.

कधी घट्ट मिठीतून व्यक्त होतं, तर कधी एका कटाक्षातून जाणवतं.

कधी दीर्घ चुंबनासाठी आसूसतं, तर कधी एक झलक दिसावी म्हणून तळमळतं.

कधी ढसाढसा रडवतं तर, कधी हातही उगारायला लावतं.

प्रेम आयुष्यात काहीही करायला भाग पाडतं.

फक्त एकच असतं ...

या एकाने काहीही करण्याला दुसऱ्याने समजून घ्यायचं असतं

आणि त्या दोघांच्या ‘एकमेकांचं काहीही समजून घेण्याला’ जगाने समजून घ्यायचं असतं...

यालाच ‘प्रेम’ म्हणायचं असतं.